गुन्ह्यांचे स्वरूप विचारात घेऊनच जामीन   

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला बारा तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने चर्चेत आलेल्या बाल न्याय मंडळात (जेजेबी) आता गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन जामीन दिला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली. येरवडा भागात बाल न्याय मंडळ आहे. त्यात एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटींवर बारा तासांत जामीन दिल्याने बाल न्याय मंडळावर समाज माध्यमातून टीका झाली होती. 
 
त्यानंतर आता बाल न्याय मंडळातील सदस्यांकडून अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप विचारात घेऊन त्यांना जामीन दिला जात आहे. मुलांना बालसुधारगृहात ठेवून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर जामिनावर सोडले जात आहे.
 
चोरी, दरोडा, विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांसाठीही तो चिंतेचा विषय आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर या मुलांना तत्काळ जामिनावर न सोडता तीन ते चार दिवस बालसुधारगृहात ठेवून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर जामीन दिला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली.
 
एखादा गुन्हा केल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. अल्पवयीनांना त्वरित जामीन दिला जात नाही. बालसुधारगृहात ठेवले जाते. तेथे त्याचे समुपदेशन केल्यानंतर जामीन मंजूर केला जातो. बाल न्यायालयात समुपदेशनावर भर दिला जातो. मुलांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर जामीनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. भविष्यात मुलांकडून गुन्हे होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष दिले जाते. 
 
- यशपाल पुरोहित (वकील) 

Related Articles